सख्यांनो, सध्याच्या कॉम्प्युटर युगात सामान्य माणूस सुद्धा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतो. काहीच अवघड राहिले नाही आता. पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहरे गमवावे लागले.
अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराजांना पाठबळ दिले. त्यांचा पराक्रम ऐकून थक्क व्हायला होतं. त्यापैकीच एक मोहरा म्हणजे शिवा काशिद. आजही पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवा काशिद च्या समाधीशी नतमस्तक होताना ऊर भरून येतो. त्यांचा जन्म पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर या गावात नाभिक समाजात झाला. ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी काम करत असत. त्यांचा चेहरा शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता.
शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. पण त्यामुळे आदिलशहा प्रचंड चिडला आणि त्याने भरपूर कुमक देऊन पन्हाळ्याला वेढा घालून शिवाजीराजाना पकडण्यासाठी सिद्धी जौहारला पाठवले. चार महिने महाराज तेथे अडकून पडले. तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कट रचला व सिद्धी जोहार बरोबर तहाची बोलणी सुरू केली. सहाजिकच सिद्धी गाफील राहिला.
12 जुलै 1660. आषाढी पौर्णिमा. रात्रीचे अंदाजे दहा वाजले होते. महाराज निवडक सहाशे मावळे बरोबर घेऊन पालखीतून निघाले. त्याच वेळी तिथून दुसरी पालखी निघाली त्यात शिवाजीसारखा पोशाख करून शिवा काशिद निघाले. सिद्धीला बरोबर चकवा देऊन महाराज निसटले पण पालखी तला शिवा काशिद मुद्दाम तिथे रेंगाळत राहिला.
सिद्धीच्या सैनिकांनी त्याला पकडले व " गनीम गनीम " म्हणून पाठलाग करून पालखी सिद्धी जौहार समोर उभी केली. शिवा काशीद बरोबर होते अवघे पंधरा-वीस मावळे आणि घेरले होते 3000 यवनांनी. सिद्धी समोर शिवाजीच्या वेशातील शिवा काशिद उतरले. सिद्धी ने तात्काळ ओळखले हा तोतया शिवाजी आहे. रागाने बेभान होऊन त्याने तलवार उपसली व विचारले " तुला मरणाची भीती वाटत नाही का? " या मर्द मावळ्याने निर्भीड छातीने उत्तर दिले " माझ्या धन्यासाठी मी एक हजार वेळा मरण पत्करेन." रागाने लालबुंद झालेल्या सिद्दीने त्याच्या पोटात तलवार खुपसली. पण इकडे तोपर्यंत शिवाजीमहाराज हुलकावणी देत सुरक्षितस्थळी पोचले होते
असे हे नेबापुरचे शिवा काशीद. मैत्रिणींनो पन्हाळगड ला जाल तेव्हा त्याच्या समाधीला जरूर भेट द्या आणि नतमस्तक व्हा. कोटी कोटी प्रणाम या निधड्या छातीच्या वीराला.
सौ. कुंदा कुलकर्णी